Monday, 8 October 2018

तेव्‍हाची 'ती' आता बदलते माझ्या मनात

लहान होतो. नववी दहावीत असेन. आमच्या गावाकडं थिएटर नव्‍हतं. एक मोठं हॉटेल सुरू झालं आणि त्याच्या मागे एक मोठा हॉल होता. त्यात प्रोजेक्‍टरवर पिक्‍चर दाखवत. नववी दहावीत असताना मे महिन्याची सुट्टी लागल्यावर आम्‍ही मित्रांनी त्या आमच्या थिएटरात पिक्‍चर बघायचा ठरला. आता नीटसं त्या सिनेमाचं नाव आठवत नाही पण रेखाचा तो सिनेमा होता. त्यात तिच्या नवर्‍यासमोरच तिच्यावर काही लोकं अत्याचार करतात. तेव्‍हा आम्‍हाला तिचं वाईट वाटलं नाही पण तो सीन आम्‍ही एन्‍जॉय करत होतो. आम्‍हाल त्यातून एक असूरी आनंद मिळत होता. रेखाला अर्धनग्न आवस्‍थेत बघताना कोणता आनंद व्‍हायचा ते तेव्‍हा सांगता आलं नाही पण आता सांगता येईल. पण आता त्याचं वाईट वाटतं. आयुष्यातील थिएटरात जाऊन मी पाहिलेला तो पहिला सिनेमा. मग आमच्या छोट्या मोठ्या दोस्‍तांच्यात त्या पिक्‍चरची चर्चा सुरू झाली. त्यात काय बघण्यासारखं आहे हे आम्‍ही एक नाही दहा पद्धतीनं सांगत होतो. त्यावेळी या गोष्टीचं काय वाटलं नाही पण आता लाज वाटते, शरम वाटते त्या दिवसांची. लाज, शरम वाटत असली तरी त्या काळापासून आता मी खूप लांब आलोय.

ते दिवस आठवण्याचं कारण म्‍हणजे आता सिनेमातील अभिनेत्रींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारांची चर्चा. नंतर नंतर चित्रपट बघण्याचं वेड लागलं ते काही सुटलं नाही. सुरूच आहे. मग पत्रकारिता करताना सिनेमाच अभ्यासाला घेतला. सिनेमाविषयी वाचन चालू केलं. वाचत राहिलो. समजून घेत राहिलो. सिनेमाविषयी गंभीर, खोलात जाऊन विचारी करणारी माणसं भेटली. बोलणारी आणि चर्चा करणार्‍या माणसांबद्दल सिनेमाकडे बघण्याची एक नजर मिळाली. सिनेमाकडेच नाही तर अखंड माणूसपणाकडं विविध नजरेनं कसं बघता येईल हे सिनेमांमुळेच कळालं.
गावाकडच्या त्या हॉलच्या थिएटरात सिनेमा बघून आलं की, आमच्यापेक्षा मोठी असणारी पोरं अभिनेत्रींविषयी काहीही सांगायची. ते आता कळतं. ती पोरं सांगायची सिनेमात काम करणार्‍या बायका चांगल्या नसत्यात, त्यांना घर-दार नसतं, त्या अनाथ असतात, त्या तसल्याच असतात, पैशासाठी कायबी करतात, त्यांची लग्नं होत नाहीत,  पिक्‍चरात येण्यासाठी आधी त्या कसबी शूटींग करायला लावत्यात, नंतर त्या तसं करत नाहीत, बलात्‍कार, अत्‍याचार, इन्‍टीमेट सीन करताना त्या बनवट शुटींग करायला लावतात, असं ती पोरं काहीही  सांगायची. त्यांच्या सांगण्याचा या ना त्या कारणांनी माझ्यावर विपरित परिणाम होते गेला. बाई या माणूस असणार्‍या गोष्टीकडे बघण्याची नजर बदलली. बाई म्‍हणजे काय?...असं खूप तुच्छतेनं मनात यायचं. ती तुच्छतेची नजर अगदी कळत्या न कळत्या वयापर्यंत माझ्यात होती असं आता मला वाटतं. आमच्या गावात नाटक असलं की शहरातून नटी यायची. ती देवळात नाही तर शाळेत उतरायची. गावाकडची फार कमी माणसं त्या नटीला घरात बोलावायची. कारण नटी म्‍हणजे ती तसलीच असणार असच गावाकडच्या लोकांना वाटायचं. पण आता कळतं तसं काही नसतं. सगळे आपापले चष्म्यातून बघत असतात, आपण लावू ते आपल्याला दिसणार, अन्‌ दिसत राहणार.
आता तनुश्रीनं लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवला आहे. तो आवाज आता उठवला असला तरी कित्‍येक दशकं तसाच तो दाबूनच ठेवला होता की. आत तनुश्रीचं समर्थन आणि नाना पाटेकरला विरोध असं मनात नसलं तरी स्‍त्री म्‍हणून होणारी तिची कुंछबना तनुश्रीच्या आवस्‍थेपेक्षा वाईट आहे. तसं म्‍हटलं तर घरातल्या आईशिवाय आपण कुणाचा आदर करतो आणि एका विशिष्ट टप्‍प्यानंतर आईलाही मग बोलायला मग जराही कचरत नाही आणि मागे हटत नाही. तिचं माणूस असणं हेच मुळात आपणाला पटणारं नसतं.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कुणाला ना कुणाला बाई विविध अर्थानं भेटते. कधी आपली आई, कधी बहीण, कधी आजी, कधी मैत्रीण, कधी प्रियेसी, कधी बायको, कधी सहकारी तर कधी फक्‍त हायबाय करण्यापुरती ओळख. अशा विविध नात्यात ती विभागली गेली असली तरी तिची विवंचना ही विविध अर्थानं वेगळी असते. ती कधी कुणाला समजते, कधी कुणाला समजत नाही. तसा विचार केला तर बाई म्‍हणून किती पातळीवर तिला संघर्ष करावा लागत असेल. बाई म्‍हणून जन्‍म असेल, नंतर नकोशी असतानाही घरात वावर असेल, घर झालं की शाळा, समाज आला, शाळेतही मग अनेकार्थनं कुंछबना, कधी हुशार नाही म्‍हणून तर कधी पारंपरिक सौंदर्यशास्‍त्रााचे निकषात बसत नाही म्‍हणून, तिच्या आयुष्यात हे निरंतर चालूच रहातं. आधी मुलगी, नंतर विद्यार्थिनी, नंतर कधी कुणाीची मैत्रीण, नंतर प्रियेसी म्‍हणून, नंतर बायको, नंतर सून, नंतर आई आणि नंतर सासू आणि नंतर म्‍हातारपण या सगळ्यात ती आयुष्यभर दबून जाते. सोसत रहाते तरीही जगत रहाते. तिच्या स्‍वाभिमानानंन कधी मग डोकं वर काढलच तर मग मृत्‍यू आहेच. तिची वाट बघतच बसलेला असतो तो. एक दोन दिवस संबंधितांना त्रास होता (दाखवण्यापुरता) आणि मग रुटीन लाईप चालू होतं. हे असच चालू रहाणार असं म्‍हणत पुन्‍ही ये रे माझ्या मागल्या म्‍हणत. आपण तिला विसरून जगणं सुरू करतो.

तनुश्रीनं आवाज उठवल्यावर दोन्हीकडे गटतट पडले. पण कुणी तनू तुझं बरोबर आहे. तिचं ऐकून घ्या असं कुणीही म्‍हटलं नाही. भलं तिचं चुकतही असेल पण तिच्याकडं दुर्लक्ष करण्यासारखंही नाही. आज तनुश्री, कंगना आणि अनेक महिला बोलताहेत त्यांच्यावरच्या अन्यायाचं. चांगल्या वाईट प्रतिक्रीया व्‍यक्‍त होत आहेत त्या व्‍हाव्‍यातही पण आपण एकच भान ठेवलं पाहिजे की तीही माणूस आहे. प्रत्येकासारख्याच तिला भावना आहेत, स्‍वाभिमान आहे, तिला मन आहे, तिला शरीर, तिच्या गरजा आहेत आणि महत्‍वाचं म्‍हणजे तिचं म्‍हणून स्‍वतंत्र असं समाजात स्‍थान आहे. तिचं ते स्‍थान आपण निर्विदपणे तिला मिळवून दिलं पाहिजे. हे बंद होणार की नाही माहिती नाही पण तिचं हलाखीचं आणि वेदनेचं अखंड जगणं अविरत सुरूच रहाणार आहे म्‍हणून हा शब्दप्रपंचही मी अर्ध्यातच सोडून देतोय...

1 comment:

  1. पूर्ण करा. उमेश सूर्यवंशी लिहिताहेत सिरीज.

    ReplyDelete

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...