Thursday, 15 November 2018

हे सगळं नकोसं झालंय!


गावाकडून कधी तरी शहरात आलो तेव्‍हा त्या गर्दीची भिती वाटली नाही. ती वाहनं, ते हॉर्न, पळणारी ती माणसांची गर्दी, छान सुटाबुटात शाळेला जाणारी पोरं, उंचच उंच इमारती आणि त्या इमारतींच्या खिडक्यांना असणार्‍या लोखंडी जाळ्या आणि गर्दीतून जाताना एक सुवासिक दरवळणारा गंध. कधी तरी शहरात आल्यावर मला जाणवलेलं हे असं शहर.

आता कितीतरी वर्षं सरली असतील असं जेव्‍हा मी गणित करतो तेव्‍हा खूप नसली तरी माझ्यासाठी ती चिक्‍कार असतात. मग उसास सोडत माझं मलाच म्‍हणतो मला, इतकी वर्षं झाली! गाव, घर सोडून. तो माझा मलाच प्रश्न असतो की माझं मीच मला दिलेलं उत्तर असतं ते त्याक्षणी समजत नाही आणि उमगतही नाही. माझ्या आत आता शहर भिनलंय असं मी इतरांसारखं कधीच म्‍हणू शकणार नाही. एवढं शहर माझ्या बाहेर राहिलंय. मग आत आता काय राहिलय हे जेव्‍हा मी विचारतो तेव्‍हा मात्र वाटतं राहिलेलं, उरलं-सुरलेलं आता नकोसं झालंय. का नकोसं झालयं तेच नेमकं कधी कळालं नाही. पण नेहमी वाटत राहंत आता हे सगळं नकोसं झालय.
तसं म्‍हटलं तरी शहर आता अंगवळणी पडायला पाहिजे होतं, ते तसं का झालं हे कधी ध्यानात येत नाही आणि आलं नाही. या शहरात आलो तेव्‍हा बसमधून उतरल्यानंतर सगळी गर्दीच गर्दी दिसली. वाहनांची आणि माणसांची. बस स्‍टँडवर उतरल्यावर सगळ्या बसच रांगा. लांबपर्यंत दिसत होत्या. हलणार्‍या त्या रांगा बघून, हलणारी ती वाहनं बघून माझ्या मनातही काही तरी हलतं आहे असं जाणवू लागलं होतं. पण ते नेमकं सांगता आणि पकडता येत नव्‍हतं. आबा सोडायला आलेले, स्‍टँडवर उतरल्यावर वाटलं की आता सायंकाळी आबा पुन्‍हा गावी जाताना मला काय काय वाटेल, गळा दाटून येईल, डोळे भरून येतील, गाव आठवले, आई, म्‍हातारी आई, गाव, घर, ढोरं, पोरं आणि तो म्‍हातारीचा टेक. हे सगळं डोळ्यासमोर येईल तेव्‍हा मला भरून येईल आणि रडूच कोसळेल असं मनोमन वाटलं. आबा तर मी गाव सोडून शहरात जाणार म्‍हणून आधीच भावूक झाले होते. त्यांना सारखं वाटायच, आणि आताही तसचं वाटतं आपल्या पोरानं आपल्या डोळ्यासमोर रहावं. हा त्यांचा हट्‌टाहास कायम राहिला आहे.

शहरात येऊन आता कितीतरी दिवस झाले तरी आजही घरी गेलो तरी आई आबांसारखांच गावाकडच्या अनेक माणसांचा एकच सवाल असतो, आता मग परत कधी येणार. मग मी म्‍हणतो आधी जाऊ तर द्या. हे नेहमीच असतं. त्यावेळी घरातले आई, आबा, म्‍हातारी आई, बाळी, विचारायची तर आता बायको विचारते मग कधी येणार. मग पुन्‍हा मी भूतकाळात जातो. तर आक्‍का शहरातून फोन करायची ये की, रे लवकर. अभ्यास नाही का. वगैरे वगैरे म्‍हणायची. दोन्‍ही बाजूनं मन जड व्‍हायचं.

गावातून बाहेर पडलं की मग पुन्‍हा गावाकडून वळून बघताना वाटायचं काय म्‍हणून हे गर्द झाडीतील दुनिया सोडून मी दुनियादारी करायला निघालोय. ती लाल कौलं, चिर्‍या-मातीच्या भिंती, शेणामातीचा गंध, गुरं ढोरं, ती मायाळू माणसं, चिडणारी म्‍हातारी जुनी खोडं, आमचं टिप्‍पो, शेतातलं घर, शेतातील जांभूळ, आंबा हे असं काय होतं. वाटेल तेव्‍हा वाटेल ते करता यायचं गावाकडं.

भाकरी नावाच्या वस्‍तुनं गाव सोडायला लावलं खरं पण भाकरी मिळाली कुठे. मिळाली तीही आर्धी आणि करपलेलीच की. तरीही गावाला सांगत राहिलो भाकरी नाही तुपातील रोटी मिळाली. उगाच खोटं खोटं जगत राहिलोय आणि तेच  माझ्या आत भिनत भिनत चाललय असंही जाणवू लागलं आता. गावासारखं खरं खरं जगणं आता कुठं राहिलंय असं वाटू लागतं तेव्‍हा मी शहरातच माझं गाव शोधत राहतो. माणसं बघतो. झाडं, गुरंढोरं, दुकानं असं काय काय आहे शहरात. बघतोय तिकडी गर्दी. माणसांची तशी दुकानांची. इथं सगळचं विक्रीला काढलय यांनी. काय मिळत नाही असं नाही. माझं गाव तेवढच यात नाही. ढळढळीत दुपार झाली की वणवा पेटवा तसं हे शहर जाणवू लागतं. माहित नाही हे फक्‍त मलाच दिसतं की आणखी कुणाला असं वाटतं. इथं खूप गर्दी आहे याचा अर्थ काय घ्यायचा. हवहवसं वाटणार्‍यांचं हे शहर आहे की थांबून आहेत ही माणसं गावाकडं जाण्यासाठी की तिकडेच चाललेत यांची पावलं.

आता या क्षणी इथं या शहरात सगळं असलं तरी हे सगळं नकोसं झालय. गर्दी नसली तरी उगाच डोळ्यात गर्दीचे भास होऊ लागलेत. वाहनांची गर्दी नाही, हॉर्न कुणी वाजवत नाही तरीही कानात घुमत राहतात हे कर्नकर्कश हॉर्न. सगळ्यांची गर्दी असली तरी माणूस कुठंय या गर्दीत. गावाकडं असणारी माणसंही इथे कुठेही सापडत नाहीत. शोधत राहिलं तरी ती चुकत राहतात. कुठे कुठे विसकटून जातात. शहरातल्या नदीवर जाऊन बसावं तर नदीच नाही तिथं. काळं, निळं शार असणारं पाणीही नाही इथं. सगळं हरवून गेलं म्‍हणूनच असेल हे सगळं नकोसं झालंय मला !
गाव, घर, महादेव पार्वती रामचंद्र
चित्र: चित्रा वैद्य (गुगलवरून साभार)sahodara

3 comments:

  1. खूप छान लिहितोस, लिहीत जा. तुझ्या ब्लॉग मधे एक विचार करायला लावणारी ओळ " इथं शहरांत सगळं विक्रिला काढलंय. सगळं विकत मिळेल पण गाव नाही".

    ReplyDelete
  2. खरच आहे आता सगळं नकोसं झालय . लहानपणापासून आम्ही शहरात वाढलो असलो तरी ....

    ReplyDelete

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...