Wednesday, 29 November 2017

हिरवे रावे आणि ट्रेन

हिरवे रावे आणि ट्रेन

हिवाळ्याच्या दाट धुक्‍यात रेल्‍वेनं घरी जाताना अंतकरण कमालीचं जड व्‍हायचं. उगाच. शहर सोडल्याची भावना मनात येई. आपण कधीच आता इथं येणार नाही असं कायतरी वाटत रहायचं. समाजायचंच नाही, तसं का वाटायचं ते. रेल्‍वे आपल्या गतीनं ते दाट धुकं चिरत चिरत जाई. मध्येच तीkamblemahadev21@gmail.com आर्तपणे ओरडल्यासारखी वाटायची. लाल, पिवळे, हिरवे सिग्नल कुठे-कुठे दिसत होते. लाल सिग्नल दाट धुक्‍यातही इतका तीव्र वाटत होता की, भितीच वाटायची त्‍याची. अंधूक अंधूक झाला तरी तिव्रपणा त्‍याच्यातील जात नव्‍हता. घटप्रभा नदीच्या पूलावर धाडधाड असा खूप मोठ्यानं ट्रेनचा आवाज येई. चंद्र चमकत राही नदीत. हळूवार उमटलेल्या लाटांवर गोलकार चंद्राचे तरंग उटे. पुर्‍या नदीभर तो चंद्र घुमत राही, चंद्र, चांदण्या, झाडं, रात्रीचा गंध त्‍यात गडद दिसत राहत.
घटप्रभा ओलांडली की, रेल्‍वेचे दोन-दोन ट्रॅक दिसायचे. टिपूर चांदण्यात काळ्या पानावर पांढरी शुभ्र सरळ रेष मारावी असे ते रेल्‍वे रूळ दिसायचे. एकाद्या वळणार गोलकार होत जाणारे ट्रॅक दिसले की कलंडणारा चंद्र दिसे. त्‍या चंद्राच्या शीतल प्रकाशात बाजूला असलेल्या निलगिरीची झाडं चकाकत. आणि येथे येऊन ट्रेनने आर्त किंकाळी केली की, त्या उंचच उंच झाडावरून एक दोन कसले तरी
पक्षी हवेत उडून जात, आणि खूप उशिरापर्यंत त्या धूसर प्रकाशात तरंगत राहत. ट्रेन खूप लांब जाईपर्यंत त्‍या पक्षांच्या खूना त्‍या धूसर मंद काळोख्या प्रकाशात मला उमटून दिसत. खूपदा झालेला तो रेल्‍वेचा प्रवास असला तरी मला तो कधीच नकोसा वाटला नाही. दरवेळी नवी माणसं, नवी जागा, नव्या चर्चा, नवी रात्र, नव्या आठवणी, नव्या चर्चा, असं खूपसं सगळं नवनवं. पण आता आठवत नाही. मिरज स्‍टेशनवरून मी शेवटचं कधी रेल्‍वेनं प्रवास केला ते.
सांगली, मिरजेत तसे आपले कुणी पै पाहुणे नाहीत. गावाकडची माणसं होती. कुठं, कुठं. तेवढचं. बाकी प्रसाद, अजित, समीरशिवाय तिथं कोण जीवाभावाचं नव्‍हतं. ऑफिसमधल्या लोकांनीही खूप जीव लावला. पण जीव लावल्याचं समजलं तेव्‍हा, खूप उशिर झाला होता. मी सांगली सोडून जाण्याच्या निर्णयानंतर ते मला तीव्रपणं समजू लागलं. प्रेम, जिव्‍हाळा, आपुलकी, माया देणारी माणसं प्रचंड असतात. जाणलं पाहिजे त्यांना आपण. वेळेत. नाहीतर ट्रेनच्या एका आर्त किंकाळीनंतर आपण खूप असे खूप मोठ्या अस्‍वस्‍थेच्या पोकळीत ढकलेले जातो. वर येता येत नाही लवकर. वर्षे दोन वर्षे सतत रेल्‍वेचा प्रवास. भारी वाटायचं. पण अस्‍वस्‍थ व्‍हायला व्‍हायचं. का ते माहित नाही. दोन वर्षे सलग रेल्‍वेचा प्रवास. डब्बे, माणसं, मोटरमन, चेकर, रेल्‍वे पोलिस, चहावाले, भेळवाले सगळे अगदी ओळखीचे झाले होते. दर सोमवारी रात्री स्‍टेशनवर थांबलं की, एक मोटरमन हमखास भेटायचा. नेहमी बघू बघून आमची ओळख झाली. आधी हसणं, नंतर एक दोन शब्द, आणि नंतर नंतर ट्रेन सुटेपर्यंत बोलणं व्‍हायचं. खूप वेळ बोलत बसायचं. चल बसून घे, म्‍हणून सांगून इंजिनच्या त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला की, एक आर्त किंकाळी असावी तसा हॉर्न वाजवत तो मोटरमन हळू हळू गाडी मार्गस्‍थ करी. गोकाकच्या पुढे एका वळणावर तो माझ्या खिडकीतून स्‍पष्ट दिसे. कधी तरी त्‍याचं लक्ष माझ्याकडं गेलं की खूप सुंदरपणे हसे तो. बिहारी हिंदी भाषेचा लहेजा देत बेळगाव स्‍टेशनवर उतरल्यार आम्‍ही दोघं त्या म्‍हातार्‍याकडचा चहा घेई. मग दहा बारा मिनिटानंतर ट्रेन सुटे. तेव्‍हा मी त्‍याला माझ्या मराठमोळ्या हिंदी भाषेत एकदा मोटरमनजवळ बसून प्रवास करायचा म्‍हटल्यावर म्‍हणाला, मत बैठ मेरे दोस्‍त इसमें. मी ओशाळून हसत पुन्‍हा विचारत राहिलो तर म्‍हणाला जायेंगे जायेंगे एक दिन, धारवाड घुमने. म्‍हणत म्‍हणत माझा तो निरोप घेई, पुन्‍हा आर्त किंकाळी देई. आणि मोठ्यानं हॉर्नचा आवाज करीत ट्रेन निघू लागली की तो दाखवत असलेला हिरवा सिग्नल बघून मला #जीएंच्या #हिरवे रावेची आठवण होई. आणि पुन्‍हा अस्‍वस्‍थ वाटे. मनात धारवाडची आठवण येई आणि हळू हळू ट्रेन दिसेनासी होई आणि तीव्र लाल रंगातील सिग्नल लुकलूकत राही.
photo : Apurva Bahadur

No comments:

Post a Comment

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...